उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स न्यूज Exclusive
महिलेचा खून(Murder ) करून आत्महत्या दाखविण्याचा प्रकार मुंबईतील दारूखाना येथे घडला आहे, ‘स्प्राऊट्स’ या मुंबईतील दैनिकाने हा गैरप्रकार उघडकीस आणला.
अभिनेता सुशांतसिंह व तिची सेक्रेटरी दिशा सॅलियन यांची आत्महत्या नव्हती, तर त्यांचा खून करण्यात असे आरोप होत होते. वास्तविक या दुर्घटना बॉलिवूडमधील व हाय प्रोफाइल वर्गातल्या होत्या, म्हणून मीडियाही त्याचा फॉलोअप करत आहे. राजकीय पक्षांतील दिग्गज नेत्यांनीही या घटनांचा वापर इलेक्शनमध्ये केला होता. आजही महाराष्ट्रातील राजकारणात या मुद्द्याला प्रचंड महत्त्व आहे. असाच एक प्रकार आता दारूखाना, मुंबई येथे घडला आहे. येथे खरोखरीच खून झालेला असूनही, आत्महत्या म्हणून प्रकरण दाबण्यात येत आहे. हा खून झोपडपट्टीतील महिलेचा असल्यामुळे मीडिया व राजकारणी त्यांच्या दृष्टीने त्याला महत्त्वही दिले जात नाही, असे ‘स्प्राऊट्स’च्या तपासात पुढे आले आहे.
मुंबईतील शिवडीजवळ दारूखाना नावाचा भाग आहे. येथील कौला बंदराजवळील झोपडपट्टीत शांती बालवाडीच्या बाजूला निर्मला वेल्लियत नावाची मुलगी राहत होती. सन २०११ च्या आसपास या मुलीचे तामिळनाडू येथे राहणाऱ्या मुलाशी लग्न जमले.
लग्नापूर्वी त्याच परिसरात राहणाऱ्या लक्ष्मण तिरुमल या इसमाशी तिची ओळख होती. लक्ष्मण हा मुंबई महानगर पालिकेत सफाई कामगार (ई – विभाग कार्यालय) म्हणून नोकरीला आहे. साधारण: ६० ते ६५ हजार पगार त्याला महिन्याकाठी मिळतो. निर्मलाशी बोलताना तो तिलाही पालिकेत सफाई कामगार म्हणून लावण्याचे खोटे आश्वासन द्यायचा व तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयन्त करायचा.
मात्र निर्मला त्याला दाद देत नव्हती.
लग्नानंतर ती आईला भेटायला मुंबईत घरी यायची. त्यावेळीही लक्ष्मण तिचा वेड्यासारखा पाठलाग करायचा. वास्तविक ती २ मुले व एका मुलीची आई तर लक्ष्मणही २ मुले व २ मुलींचा बाप झाला होता. मात्र लक्ष्मणाला त्याचे भान नव्हते. त्याची निर्मलावर वाईट नजर होती.
यानंतरही लक्ष्मणने तिला दारूखाना या भागातच राहण्याची गळ घातली. तिला पालिकेत सफाई कामगार म्हणून लावण्याचे आश्वासनही दिले. दुर्दैवाने यावेळी ती त्याच्या भूलथापांना बळी पडली. ती तामिळनाडूतील नवरा व मुले यांना सोडून मुंबईत आली. लक्ष्मणाने तिच्यासाठी वडाळा येथील झोपडपट्टीत भाड्याने घर घेतले. तिथे तोही तिच्याबरोबर राहू लागला.
अधिक वाचा : – घनकचरा विभागालाही कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराची दुर्गंधी
आपल्या अनैतिक नात्याचा थांगपत्ता लोकांना कळू नये, म्हणून तो ११ महिन्यानंतर घरेही बदलत असे. हा प्रकार साधारणतः मागील ५ ते ६ वर्षांपासून चालू होता.
मागील वर्षी म्हणजेच सुमारे २ महिन्यांपूर्वी निर्मलाच्या मुली उन्हाळ्याच्या सुट्टीत तामिळनाडूहुन मुंबईत आजीकडे आल्या. आजीही पालिकेत घनखात्यात श्रमिक कामगार आहे. त्यावेळी मुलांनी फारच आग्रह केला म्हणून आजीने त्यांची निर्मलाशी भेट घडवून आणली आणि तेव्हापासून त्याही निर्मलाबरोबर एकत्र राहू लागल्या.
निर्मलाने आपल्या मुलांबरोबर राहणे, लक्ष्मणला मान्य नव्हते. तो कधी बायकोबरोबर तर कधी निर्मलाबरोबर राहत असे. मात्र जेव्हा जेव्हा तो निर्मलाच्या घरी राहायला येई, तेव्हा तेव्हा त्याचे निर्मला व तिच्या मुलांबरोबर खटके उडत असत.
सततच्या भांडणाला कंटाळून त्याने तिला कायमचाच संपविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तो तिच्याशी एकदम गोड बोलू लागला आणि ठरल्याप्रमाणे दिनांक २५ एप्रिल २०२४ रोजी त्याने उंदीर मारण्यासाठी आणलेल्या ट्यूबमधील विष तिला इतर पदार्थांतून खाऊ घातले व तेथून पळ काढला.
त्यानंतर तिची अचानक तब्येत बिघडली, पण आपल्या बरोबर नेमके काय झाले आहे याचा तिला थांगपत्ता नव्हता.तब्येत जास्तच बिघडल्यावर, तिने तिची आई वनसुंदरी हिला फोन केला. वनसुंदरीने तिला तात्काळ जे जे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी हा प्रकार विष खाल्यामुळे झाला आहे व तिचा जीव वाचणे अशक्य असल्याचे सांगितले.
डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणेच घडले, निर्मलाने (वय ४२) अवघ्या तासाभरातच प्राण सोडला. सध्या हे प्रकरण आत्महत्या असल्याचे सांगितले जाते. मात्र आत्महत्येपूर्वी तिच्याजवळ किंवा घरात तशी कोणत्याही स्वरूपाची चिट्ठी सापडलेली नाही.
निर्मलाची आई व नातेवाईक यांनी तिचा मृतदेह दारूखाना येथील कौला बंदर येथे आणला व तिच्यावर अंत्यसंस्कार केले.
सध्या तिची आई, ३ मुले ही प्रचंड मानसिक तणावात व दहशतीखाली आहेत. लक्ष्मण, त्याचा भाऊ शिवराम यांनी प्रकरण उजेडात न आणण्यासाठी , पीडित महिलेची आई आणि तीनही मुलांना धमकी दिली आहे. पैशाचे अमिष दाखविण्याचेही प्रकार झाले. तरी पोलिसांनी योग्य तपास करावा. याप्रकरणी संशयित लक्ष्मण, त्याचा भाऊ, जिजाजी याचबरोबर जेजे हॉस्पिटलमधील डॉक्टर्स, स्टाफ यांची भूमिकाही संशयास्पद आहे. या सर्वांची शिवडी येथील पोलिसांनी त्वरित चौकशी करायला हवी व मुख्य आरोपीवर १२० बी, ३०२ या कलमांतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी Sprouts News तर्फे करण्यात येत आहे.